शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

नावात न गुंतलेले नाते

नावात न गुंतलेले नाते
कालच व्हॅलेन्टिन डे साजरा केल्या गेला. प्रेमाचा दिवस ! प्रेम, मग ते आईवडिलांप्रती असो , भाऊ बहीण,नातेवाईक, नवरा बायको किंवा प्रियकर प्रेयसी असो, अथवा मातृभूमीबद्दल असो, त्या प्रेमाच्या भावनेला मान देण्यासाठी खास हा दिवस !
प्रेम म्हंटले कि आपल्या समोर येतात ते राधा आणि कृष्ण !
त्यांच्या नात्याबद्दल तर खूप काही लिहिल्या गेले आहे. त्यांचे अवर्णनीय, पवित्र असे प्रेम अद्वितीय आहे. भलेही त्यांचे एकमेकांसोबत लग्न झालेले नसले तरी सुद्धा मूर्तिरूपात राधा नेहमीच कृष्णाच्या बाजूला असते आणि दोघेही एकत्रितपणे पुजल्या जातात. पण त्याच कृष्णाची धर्मसम्मत पत्नी , रुख्मिणी मात्र त्याच्या सोबत कधीच राहत नाही. विठ्ठलाचे आद्य पूजनीय स्थान असलेल्या पंढरपुरात दोघांचेही मंदिर वेगवेगळे आहेत. हा, बाकी गावांमध्ये नंतर बांधलेल्या देवळांमध्ये जरी विठ्ठल-रुख्माई सोबत असली तरी कृष्णाच्या रूपात असतांना बाजूला असण्याचा मान नेहमीच राधेला मिळालेला आहे. " प्रियकर प्रेयसी" या नात्याचे ते आदर्श आहेत.
पण आज कृष्णाच्या आयुष्यातल्या एका दुसऱ्याच नात्याबद्दल लिहावेसे वाटते.
द्रौपदी !
अग्निकन्या, पांचाली, कुरुकुलसम्राज्ञी,पांडवपत्नी अशी द्रौपदी हि कृष्णा या नावाने सुद्धा ओळखल्या जाते.
संपूर्ण महाभारतामध्ये कृष्ण जिला "सखी " या नावाने संबोधतो अशी हि एकमेव स्त्री आहे. राधेचा उल्लेख महाभारतात नसला, तरी सुद्धा कृष्णाने त्याच्या कुठल्या राणीला देखील सखी मानलेले नाही.
भारतीय लोकांना प्रत्येक संबंधांना नात्याचे लेबल देण्याची खूप वाईट खोड आहे. साधे बाजारात, रस्त्यावर असतांना सुद्धा कुणाला काही म्हणायचे असले तर काका,भैय्या, काकू,मावशी ,ताई अशी हाक द्यावी लागते. जर चुकूनच कुणाला "ओ बाई म्हंटले तर फणकारुन ती स्त्री मारक्या म्हशीसारखी आपल्याकडे बघते. पुरुषासाठी तर काय हाक मारतात हेच मला आठवत नाही आहे, यातच सगळे काही आले.
  कृष्ण आणि द्रौपदी मात्र कुठल्याच नात्याने बांधलेले नाहीत. हा, कोणी म्हणते कि त्यांचे नाते भाव-बहिणी सारखे होते, द्रौपदी ने आपला भरजरी शेला फाडून कृष्णाची जखम बांधली होती तेव्हापासून राखीला सुरुवात झाली अशी अख्यायिका प्रसिद्ध असली तरी सुद्धा, महाभारतात त्याने तिला बहीण म्हंटलेले नाही. जगन्नाथपुरी येथे कृष्ण,बलराम आणि सुभद्रा या बहीणभावांचे असे एकमेव देऊळ आहे. तिथे द्रौपदी नाही.
कृष्णाने द्रौपदी स्वयंवरात भाग न घेता फक्त श्रोत्यांची भूमिका निभावली. म्हणजेच कृष्ण द्रौपदीचा "संभाव्य पत्नी" या नात्याने सुद्धा विचार करत नव्हता.
पांडव कृष्णाचे आत्येभाऊ होते. या नात्याने द्रौपदी त्याची वहिनी होते. पण त्याने तिला कधीच त्या नावे संबोधले नाही.
अर्जुन तर त्याचा आत्येभाऊ असण्यापेक्षा मित्र म्हणून जास्त जवळचा होता. पण त्यांच्यात सुद्धा कृष्ण एक मार्गदर्शक या नात्याने थोडासा वरचढच दाखवल्या जातो. अर्जुन त्याच्याकडे भक्तिभावाने पाहतो असेच जाणवते.
भक्त आणि देव यांच्यात सुद्धा छोटा-मोठा हा भाव असतो. पण कृष्ण आणि द्रौपदी या दोघांचे नाते एका सामान पातळीवर दाखविल्या गेले आहे. त्यांचे अनोखे नाते अधोरेखित करणारे अनेक प्रसंग आपण बघतो.
विदुषी असलेली द्रौपदी कधी कृष्णासोबत वाद घालतांना दिसते तर कधी कृष्ण तिला चुकांसाठी धारेवर धरताना दिसतो.
कधी संकटात तिने आर्तपणे त्याला साद घातली आहे आणि तोही तितक्याच तीव्रतेने तिच्यासाठी धावून आला आहे.
वस्रहरणाचा प्रसंग हा एक सांकेतिक भाग समजायला हवा.
पांडव आपले राज्य आणि सगळे अधिकार गमावून बसले होते. दास म्हणून त्यांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता.वस्त्रहरण म्हणजे त्यांचे सगळे सामाजिक आणि राजनैतिक अधिकारांचे हरण. द्रौपदी आणि पांडवांना दास बनवून कौरवांनी आपले शक्तिप्रदर्शन केले.
द्यूत होणार हे सगळ्यांनाच माहिती होते. अगदी पांचालांना सुद्धा. आणि त्यामागे कौरवांचा काय राजकीय डाव असू शकतो हे न समजण्याइतके पांचाल निर्बुद्ध नव्हते. त्या वेळी पांचाल राज्य खूप बलाढ्य होते. त्यांचा दबदबा खूप होता. द्रौपदी तर त्याची मुलगीच. तिने त्यांना का नाही बोलावले ? द्यूताचे संभाव्य परिणाम आणि धोके लक्षात घेता जर पांचालांचे बलाढ्य सैन्य आधीच तयारीत असते तर कौरवांना द्रौपदीच्या नखालाही हात लावण्याची हिम्मत झाली असती का ?
आता या ठिकाणी भावनिक आणि चमत्काराचा भाग सोडला तरी सुद्धा हे बघायला हवे कि तेव्हाच्या सामाजिक आणि धार्मिक संकेतानुसार कृष्णाला द्रौपदीची मदत करण्याचा,किंवा तिच्यासाठी शस्त्र उचलून युद्ध करण्याचा काहीच अधिकार नव्हता. पांडव द्यूतामध्ये सगळे काही हरले होते. कृष्ण त्यांच्या मदतीला गेला नाही. अगदी त्यांना दास बनवले तेव्हा सुद्धा नाही. पण तो चतुर राजकारणी होता. त्याला द्युतामागचे राजकारण समजत होते. आणि तो संपूर्ण तयारीत होता.
त्याने द्रौपदीभोवती वस्त्रांचा वेढा घातला आणि तिची लाज राखली याचा अर्थ कृष्णाने आपल्या संपूर्ण नारायणी सेनेसोबत हस्तिनापूरला वेढा घातला आणि कौरवांना युद्धाचा इशारा दिला.यादवांच्या अतिबलाढ्य नारायणी सेनेसमोर कौरवांचे सैन्य काहीच नव्हते. आणि म्हणूनच धोका जाणवून धृतराष्ट्राने सामोपचाराची भाषा करत द्रौपदीला तीन वर देऊन यादव सेनेपासून आपल्या मुलांची सुटका करून घेतली.
भलेही महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा नाश करून या अपमानाचा सूड घेतला तरी प्रत्यक्ष तेव्हा कृष्णानेच द्रौपदी आणि पांडवांची लाज राखली हेच खरे.   
महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी जेव्हा कृष्ण शांतिप्रस्ताव घेऊन जातो तेव्हा द्रौपदी त्याला विद्ध स्वरात जाब विचारते कि माधवा, माझा भरसभेत इतका मोठा अपमान करणाऱ्या दुष्टांचा विनाश करण्याऐवजी तू त्यांच्यासोबत संधी का करतो आहेस ? तेव्हा कृष्ण तिला आश्वस्त करत म्हणतो कि तुझ्या अपमानाचा सूड अवश्य घेतल्या जाईल. हा शांतिप्रस्ताव एक राजनैतिक उपचार आहे, तो पाळावाच लागेल.
या वर ती मानिनी विचारते कि जर त्यांनी प्रस्ताव स्वीकारला तर ?
तेव्हा हसून तो द्रष्टा म्हणतो कि मला दुर्योधनाच्या अहंकारावर विश्वास आहे. तो हा प्रस्ताव कधीच स्वीकारणार नाही. आणि झालेही तसेच. शांतिप्रस्ताव नाकारल्या गेला आणि युद्ध अटळ झाले.युद्ध पूर्वी सुद्धा कृष्ण द्रौपदीला युद्धाची भयावहता सांगून सावध करतो कि तू सगळे काही गमावशील. उरेल ते फक्त तुझे पाच पती. तुझ्या अपमानाचा प्रतिशोध तर घेतला जाईल पण त्याची जबर किंमत तुलाच चुकवावी लागेल.
द्रौपदी त्यासाठी तयार होती. धर्माचे राज्य स्थापन करण्यासाठी कृष्णाने सगळे नीतिनियम बाजूला ठेवत पांडवांना युद्ध जिंकवून दिले. पण प्रत्येक वेळी त्याने द्रौपदीच्या अपमानाचा उल्लेख करून भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन आणि कौरवांची निर्भत्सना केली आहे. तो प्रत्येकाच्या वधापूर्वी हेच म्हणतो कि बाकीचे दुष्ट्कर्म तर आहेतच पण द्रौपदीचा अपमान करणे आणि त्याचा विरोध न करता चूप राहणे या एकाच पापाची शिक्षा म्हणून तुम्हाला वीरोचित मरण मिळणार नाही. उपरोल्लेखित सगळ्याच वीरपुरुषांना क्षत्रियोचित मरण मिळाले नाही. या परती दुर्गती काय होऊ शकते ?
कृष्णाला द्रौपदी बद्दल इतकी आत्मीयता का वाटायची याबद्दल व्यास मौन आहेत. द्रौपदीच्या स्वयंवराचा पण अर्जुनाने जिंकून सुद्धा जेव्हा पाच पांडवांसोबत तिचे लग्न लावण्याचे ठरते तेव्हा व्यास तिथे येऊन म्हणतात कि द्रौपदीने पूर्वजन्मामध्ये पाच वेळा पांच गुण असेलेला पती मागितला म्हणून तिला या जन्मात पाचजणांसोबत लग्न करावे लागते आहे.त्या वेळी कृष्ण तिथे नव्हता. एका आख्यायिकेनुसार कृष्ण द्रौपदीला विचारतो कि तू इतकी विद्वान असूनहि पूर्वजन्माच्या या तर्कावर कसा काय विश्वास ठेवला ? पूर्व जन्म आणि त्याचे कर्मफळ हे योनीज जीवांना भोगावे लागते. म्हणजेच ज्यांचा जन्म नैसर्गिक रित्या झालेला आहे. तू अयोनिजा आहेस. तुला पूर्वजन्म कुठून आला ? आणि पूर्वजन्मच नाही तर मग त्याचे कर्मफळ तरी कश्याला मिळणार ? तुला पाच लोकांसोबत लग्न करण्याची गरजच नव्हती. इथे मात्र कृष्णाच्या एकंदर संवादातून , आपण द्रौपदीला पाच पतींसोबत संसार करण्याच्या कठीण प्रसंगापासून वाचवू शकलो नाही  याची खंत दिसून पडते. जे घडले ते घडले हे स्वीकारून कृष्ण द्रौपदीला शुभकामना देतो. पण तिच्याप्रति त्याची काळजी जाणवून येते.
सत्यभामा  जेव्हा पतीला खुश कसे ठेवायचे याबद्दल विचारणा करते तेव्हा कृष्ण द्रौपदीकडेच तिला पाठवतो. का बरे ? कारण त्याला द्रौपदीच्या कर्तृत्वाची सार्थ जाणीव होती आणि ती  योग्य मार्गदर्शन करेल याची खात्री होती.
अनेक प्रसंग, अनेक आख्यायिका !
परस्परांबद्दल विश्वास, आत्मीयता,प्रेम,आदर, अभिमान आणि स्नेह असे सगळेच पैलू त्या दोघांच्या नात्यात दिसतात. म्हणूनच सगळ्या नात्यामध्ये आदर्श असलेला पुरुषोत्तम,पूर्णावतार श्रीकृष्ण तिच्यासाठी "सखा" आहे आणि ती त्याची "सखी".
स्त्रीपुरुषांच्या मैत्रीकडे दूषित नजरेने पाहणाऱ्या समाजाला त्यांचे नाते जरी कुठल्या नावाच्या चौकटीत बांधून ठेवायचे असले तरी ते तसे होऊ शकत नाही. त्यांचे नाते त्या पलीकडले आहे असे मला नेहमीच वाटत आले.
जेव्हा जेव्हा मी कवीश्रेष्ठ गुलझारचे हे गीत ऐकते तेव्हा मला कृष्ण आणि त्याच्या त्या सखीचीच आठवण येते. 
" हमने देखी है उन आँखोंकी महकती खशबू , हाथ से छुके उसे रीश्तो का इलझाम ना दो
सिर्फ एहसास है ये, रुह से मेहसूस करो, प्यार को प्यार हि रहने दो कोई नाम ना दो "
 
-    पूर्णिमा देशमुख पुरेकर