शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

कोंडीत अडकलेला भुलोजी

 श्री 

कोंडीत अडकलेला भुलोजी

 आमच्या लहानपणी दसऱ्या पासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पाच दिवस भुलाबाईची पूजा घरोघरी केली जायची. भुलाबाई आणि भुलोजी म्हणजे पार्वती आणि महादेव आणि त्यांच्या मांडीवर बसलेला छोटासा गणपती. 

भोलानाथ असलेल्या भुलोजीची बायको ती भुलाबाई ! भुलाबाईच्या गाण्यांमध्ये माहेरी आलेल्या सासुरवाशिणींचे अनुभव, संसार - माहेरातला फरक, तिथे होणारी घुसमट, बदललेले वातावरण, जबाबदाऱ्यांचा ताण, आपले स्थान निर्माण करण्याची केविलवाणी धडपड आणि कडू गोड आठवणींचे सार दिसून येते. पण त्याचसोबत व्यावहारिक गोष्टी , चालीरीती आणि शारीरिक स्थित्यंतरेही शिकवण्यासाठी त्या गाण्यांचा सुयोग्य वापर केल्या गेलेला दिसतो. 

  अभ्यास,ट्युशन आणि  मोबाइल ने मुलामुलींचे निर्भेळ आनंदी बालपण हिरावून घेतले आहे. त्याचमुळे भुलाबाईची परंपरा आता लुप्त होत चालली आहे. पण भुलाबाईचे विश्व आजही तसेच आहे. हा, त्यात करिअर आणि बदललेल्या सामाजिक पैलूंची भरच पडली आहे. 

आजही अनेक भुलाबाई सासरच्या वाटेवरच्या काट्यांनी घायाळ होतातच आहे. अजूनही तिला घरच्या आणि बाहेरच्या कामांमधून निवांतपणा मिळवण्यासाठी रोज रोज कारल्याचा वेल लावून फुलण्याची वाट पाहावीच लागते आहे. अजूनही ती सासरच्या सत्ता राजकारणाने विद्ध होते आहे, सासू सासरे,नणंदा-जावा, आणि मुलांबाळांच्या पै पाहुण्यांच्या सरबराईच्या ओझ्याखाली आपल्या भुलोजी पासून दुरावली आहे.भरीसभर आता करिअर आणि बाहेरची कामे यांचे जोखड आहेच. भुलाबाई या सगळ्या कोंडमाऱ्यात रडवेली होणार नाही तर काय ?

 भुलोजीची कथा तरी काय निराळी ? तो बिचारा कमावता होऊनही घरात अजूनही दुय्यमच आहे. घरामध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अजूनही चाचपडतोच आहे. काही बोलायला जावे तर " आता तुझ्याकडून शिकायचे का आम्ही ?" या वाक्यात कधी वडिलांकडून तर कधी आई कडूनच त्याची भलावण केली जाते. लग्न झाले, पोरं झाली तरी सुद्धा अजूनही त्याला " मोठे " झाल्याचा मान नाही. अजूनही जेव्हा बायकोसमोर जेव्हा त्याच्या मतांना काडीचे महत्व नाही असे दाखवल्या जाते तेव्हा त्याचे दुखावलेले मन तो कुणाच समोर उघड करू शकत नाही. त्यातच त्याच्या बायकोचे देखील तेच गाऱ्हाणे असते. "ते" घर अजूनही " त्यांचे - आपले " झाले नसल्याची जाणीव तिला हि खुपते आहे आणि त्यालाही! पण तिच्या समोर ते कबूल करणे म्हणजे आपल्याच आई वडिलांविरुद्ध बोलल्या सारखे होते असे जाणवून तो तिला अजूनच दूर लोटतो आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ असल्यामुळे त्याने तोंड घट्ट मिटून घेतले खरे पण तोच कोंडीत अडकल्या गेला हे त्याला कळतच नाही. 

घरातला सत्ता संघर्ष आणि बाहेरची जीवघेणी चढाओढ यात त्याची कुतरओढ कुणाच्या लक्षात येताच नाही.  

  भुलाबाई तरी निदान माहेरी आपल्या दुःखाला वाट करून घुसमटीतून अंशतः मोकळी होते. 

पण भुलोजीच्या व्यथेला वाचा कधी फुटणार का ? 

- सौ.पूर्णिमा अतुल देशमुख-पुरेकर