गुरुवार, २६ मार्च, २०२०

कै. रमेश मोरेश्वर पुरेकर - एक आधारवड


कै. रमेश मोरेश्वर पुरेकर - एक आधारवड
दादाकाकांबद्दल काय लिहावे ? एकच सुभाषित आठवते.
वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि l
लोकोत्तराणां चेतांसि को हि विक्षातुमर्हति ll
थोर पुरुष हे प्रसंगी कधी इंद्राच्या वज्राप्रमाणे कठोर तर कधी फुलासारखे कोमल असतात. आणि हे प्रसंगोचित वर्तनच त्यांना समाजात सन्मान आणि कीर्ती मिळवून देतात.
दादाकाका असेच होते.
बुद्धी आणि आत्मविश्वास, जिद्द आणि तत्पर निर्णय क्षमता, धैर्य आणि विवेक या गुणांनी त्यांचे आयुष्य उजळून टाकले.
कै. मोरेश्वर उर्फ भाऊसाहेब पुरेकर आणि कै. इंदुमती पुरेकर यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र. लहानपणापासूनच कुशाग्र ! पुढे scholarship मिळवून त्यांनी धनबाद येथील school of Mines मधून Mining मध्ये engineering केले. आणि Indian coal Mines मध्ये रुजू झाले.
बंगालच्या आसनसोल येथे अनेक वर्ष त्यांना अतिशय कठीण, धोकादायक वातावरणात राहावे लागले. तरीही तिथे सुद्धा त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने नावलौकिक मिळवला. नंतर जेव्हा नागपूरला त्यांची बदली झाली तेव्हा सुद्धा त्यांचा दरारा आणि कुठलेही काम तडीस लावण्याची हातोटी यामुळे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि Director ( Technical ) या उच्च पदावर पोहचून ते सेवानिवृत्त झाले. "Task Master " या नावानेच ते प्रसिद्ध होते. निवृत्ती नंतर सुद्धा अनेक लोक त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत.
 त्यांचा दरारा आणि धाक जरी असला तरी त्यांची सगळ्यांना मदत करणे आणि दुसऱ्यांमधले सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देत पुढे येण्याची संधी देणे या स्वभाव वैशिष्ठ्यांमुळे अनेक लोक त्यांच्याशी जुळले. त्यात गरीब-श्रीमंत , शिक्षित-अशिक्षित असाही भेद नव्हता. कारण त्यांच्या वर वर कठोर वाटणाऱ्या स्वभावामागची त्यांची तळमळ समजून यायची.
  आम्हा पुरेकर घराण्याचे तर ते "आधारवड" होते. वडाच्या पारंब्या सर्वदूर पसरल्या आहेत. छोट्यातल्या छोट्या पारंबीसाठी त्यांचा आधार होता. सख्खे-चुलत कोणीही असो ते प्रत्येकासाठी एक संरक्षक ढाल होते. कठीण प्रसंगी त्यांनी अनेकदा कठोर निर्णय घेतले पण ते कुटुंबाच्या भल्यासाठीच ! प्रत्येकालाच त्यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे. आर्थिक मदत तर केलीच पण त्याचसोबत मानसिक पाठबळ दिले. कुटुंबातल्या प्रत्येकासाठी कष्ट घेतले.
त्यांच्या या सर्व प्रपंचामध्ये त्यांची पत्नी, सरोजकाकू हिचा खूप मोठा वाट आहे. तिने त्यांना सगळ्याच प्रसंगी भक्कम साथ दिली. दोघांनीही नातेवाईकांचे आस्थेने केले. शिक्षण असो अथवा लग्नकार्य असो, त्यांनी सगळ्यांचे थोरलेपणाने केले.
शिक्षणासाठी मी जेव्हा नागपूरला त्यांच्याकडे होती तेव्हा काकांच्या स्वभावाच्या दोन्ही बाजू बघण्याची संधी मला मिळाली. लहानपणापासून त्यांच्या प्रति एक आदरयुक्त भीती वाटत होती. पण त्याकाळात काकांच्या काळजी घेण्याच्या स्वभावाचा प्रत्यय आला. काकू तिथे नसतांना रोज ते मला सकाळी चहा करून देत. मी पहिल्यांदा जेव्हा नागपूरहुन वर्धेला बसने जाण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांना तो पटला नाही, तरीसुद्धा माझ्या हट्टापायी त्यांनी मला बस मध्ये स्वतः बसवले. बसचा नंबर लिहून घेतला आणि बाबांना फोन वर तो कळवून त्यांना मला घ्यायला जाण्यास सांगितले. मी घरी पोहचे पर्यंत त्यांनी - वेळा फोन केले. त्यांची काळजी अजूनही आठवते. माझा मुलगा चि.ऋत्विक सोबत त्याच्या गाड्यांसोबत खेळणे आठवते. त्या सगळ्या आठवणी आज भोवती जमल्या आहेत.
आज ते आमच्यात नाहीत. खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पण दैवगतीपुढे कुणाचे काय चालते ?
त्यांचे आश्वासक आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच. त्यांचे आयुष्य आमच्यासाठी मार्गदर्शक राहील. 
त्यांना शांती मिळो हि प्रभू चरणी प्रार्थना !
-पूर्णिमा देशमुख पुरेकर


  

 
     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा