मंगळवार, ३१ मार्च, २०२०

दुष्ट ठरलेली द्रष्टा स्त्री - कैकेयी


            दुष्ट ठरलेली द्रष्टा स्त्री - कैकेयी

काही दिवसांपूर्वी सुरेश कला नामक एका लेखकाने लिहिलेल्या "kaikeyi - The Mother of a God " या पुस्तकाचे परीक्षण वाचले ( पुस्तक नाही वाचले अजून ) आणि मग कैकेयी बद्दल अजून काय माहिती मिळते हे बघण्यास सुरुवात केली. आणि त्यातून मिळालेल्या माहितीवरून  कैकेयी या विवादित व्यक्तिरेखेबद्दल लिहिण्याचे धारिष्ट्य करते आहे. हे लिखाण ज्या कथा,किवंदंती आणि रामायणाच्या वेगवेगळ्या आवृत्तीमधल्या आख्यायिका बद्दल काही पुस्तकांमध्ये आणि काही लेखांमध्ये वाचले त्यावरून लिहिले आहे. मूळ आवृत्ती वाचलेली नाही, हे पहिलेच स्पष्ट करते.
योगायोगाने आजच दूरदर्शन वर पुन्हा प्रसारित झालेल्या रामायणामध्ये कैकेयी दशरथाला त्याने दिलेल्या दोन वचनांची आठवण देऊन रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक मागून घेतांना दाखवल्या गेले. अर्थात नेहमीप्रमाणेच तिचे चित्रण पूर्णपणे एक खलनायिका , एक दुष्ट सावत्र आई आणि महत्वाकांक्षी स्त्री असेच दाखवल्या गेले. त्यात काहीच नवीन नाही.
रामायणामध्ये बहुतेक सगळीच पात्रे " black or white " अशी दाखवल्या गेली आहेत.
बहुतेक सगळेच आदर्शत्वाच्या अत्युच्च कल्पना प्रस्थापित करतांना दिसतात.रामायण म्हणजे सुरज बडजात्याच्या सिनेमासारखे आहे. सगळे काही " goody goody ".
अपवाद फक्त रावण आणि कैकेयी. ही दोनच पात्रे पूर्णतः " black " !
कैकेयी हि कैकेय राज्याची राजकन्या. कैकेय राज्य हे सध्याच्या भारताचा उत्तरपश्चिमेकडचा ; कदाचित पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यामधला प्रदेश असावा असे जाणकारांचे अनुमान आहे.
तर या कैकेय देशाचा राजा होता अश्वपती. या राजाला पशु पक्ष्यांची भाषा समजत असे. पण ज्या दिवशी तो कुठल्याही पशु पक्ष्याने काय म्हंटले हे दुसऱ्या कुणाला सांगेल त्या दिवशी त्याचा मृत्यू होईल असा त्याला शाप मिळाला होता.
एके दिवशी राजा आणि राणी ( तिचे नाव नाही कळले), बागेत फिरत असतांना दोन राजहंसांचे संभाषण राजाने ऐकले. ते संभाषण अत्यंत विनोदी आणि मनोरंजक असल्यामुळे राजाला खूप हसू आले. त्याचे हसणे एकूण राणीने राजाला तो का हसतो आहे हे विचारले. तेव्हा राजाने फक्त एव्हढेच सांगितले कि दोन राजहंसांचे विनोदी संभाषण ऐकल्यामुळे मी हसतो आहे. झाले. शाप विसरून राणी हट्ट धरून बसली कि काय ऐकले ते मला सांगाच. राजाला या उद्दामपणाचा राग आला. आणि त्याने राणीला राज्याबाहेर हाकलून दिले. पुन्हा कधी तिथे येण्यास आणि कुणालाही भेटण्यास मज्जाव केला. त्यामुळेच कैकेयीचे लालन पालन मंथरा नामक दाईने केले. म्हणूनच मंथरा सतत तिच्या सोबत राहिली. अगदी सासरी सुद्धा. 
कैकेयी ही सात भावांची लाडकी लहान बहीण. ती सुंदर तर होतीच त्याचसोबत अतिशय बुद्धिमान होती. शिवाय तिच्या सात भावांनी तिला अस्त्र,शस्त्र,घोडेस्वारी,सारथ्य,युद्धनीती,डावपेच,राजकारण आणि कूटनीती यातही प्रवीण बनवले. कैकेयी हि भारतीय वेदपुराणातल्या अनेक युद्दनिपुण वीरांगनांपैकी एक योद्धा आहे.
शाप आणि वरदान यात या पराक्रमी, द्रष्टा अश्या कैकेयीचे आयुष्य फसलेले आहे.
लहानपणी तिने खेळता खेळता एका ऋषींच्या मुखाला काळे फसले. क्रोधीत होऊन त्याने तिला शाप दिला कि आज तू माझे तोंड काळे केलेस पण पृथ्वीतलावर नेहमीसाठी तुझ्या नावाला काळिमा लागेल. यापुढे कुणीही आपल्या मुलीचे नाव कैकेयी ठेवणार नाही. झालेही तसेच.
नियतीने मोठे कार्य होण्यासाठी या शाप आणि वरदानाचा वापर करून घेतलेला दिसून येतो. कैकेयी या नियतीच्या पटावरचे एक प्यादं बनली.
अश्वपती राजघराण्याचे कुलगुरू होते ऋषी " रत्न " . एका आख्यायिकेनुसार हे ऋषी श्रावणकुमाराचे पणजोबा होते. ते खूप मोठे ज्योतिषीतज्ञ होते. जेव्हा सूर्याच्या कृपेने कैकेयीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी ती जाणती झाल्यानंतर तिला भविष्यातल्या घटनांची पूर्वकल्पना आधीच देऊन ठेवली आणि त्या टाळण्यासाठी काय करायचे हे सुद्धा सांगून ठेवले. काय सांगितले त्यांनी ?
"तुझे लग्न राजा दशरथासोबत होईल. राजा दशरथ जरी थोर अश्या इश्वाकू कुळात जन्माला आला तरी त्याला शाप मिळाला आहे कि पुत्रशोकाने त्याचा मृत्यू होईल. पण या शापासोबतच एक अजून ज्योतिषीय घटना घडेल. त्या पुढील १४ वर्ष इश्वाकू कुळासाठी अत्यंत बिकट अशी राहणार आहे. राजपदी जो कोणी बसेल त्याला सुद्धा मृत्युमुखी पडावे लागेल. आणि म्हणूनच तुला इश्वाकू कुल वाचवण्यासाठी महान त्याग करावा लागेल. तुला तुझा मानसम्मान,संस्कार आणि कीर्ती त्यागून दिगंतापर्यंत अपकीर्ती स्वीकारावी लागेल. पण तू एक महान कार्य करण्यासाठी जन्माला आलेली आहे. विष्णूचे धर्म स्थापनेचे कार्य करण्यात तुझाच महत्वाचा वाट राहणार आहे."
ऋषी रत्नाचे हे भविष्य कथन किती भयावह होते ! तरीसुद्धा कैकेयीने प्राक्तन स्वीकारले.
याच कैकेयीला लग्नाआधी एक अजून वरदान मिळाले होते. एका ऋषींचे प्राण वाचवल्यामुळे त्याने तिला वरदान दिले कि तिचा डावा हात हा वज्राप्रमाणे होईल. कुठल्याही अस्त्र किंवा शस्त्रामुळे हाताला इजा होणार नाही. हे वरदान तिच्या कामी आले.
कैकेयीचे दशरथासोबत लग्न झाले तेव्हा दशरथ फार वयस्क होता. कैकेयी दशरथापेक्षा खूपच लहान होती. वंशवृद्धीसाठी शेवटचा प्रयत्न म्हणूनच दशरथाने तरुण कैकेयीसोबत विवाह केला. त्याच्या आधीच राण्या होत्या. पण  दोघींपैकी एकीलाही पुत्र तर झालाच नाही पण त्यांचे सुद्धा वय झालेच होते. मातृप्रेमाला वंचित अश्या कैकेयीसाठी कौसल्या मातृस्थानी आणि सुमित्रा मोठ्या बहिणीप्रमाणेच होती. तिन्ही राण्यांचे एकमेकींसोबतचे संबंध असेच दर्शविले आहे. 
एकदा राजा दशरथाला इंद्राने सम्बासुरासोबत युद्द्ध करण्यासाठी बोलावले. कैकेयीच्या युद्धकौशल्यामुळे ती सुद्धा युद्धात सहभागी होती. दशरथाच्या रथाच्या चाकाचा खिळा निखळून पडला असता कैकेयीने आपल्या डाव्या हाताची करंगळी अडकवली. आणि उजव्या हाताने रथ हाकारून दशरथाला सुरक्षित स्थानी नेले. आणि ती पुन्हा युद्धाला सामोरी गेली. सम्बासुर युद्ध हरला. कैकेयी जेव्हा दशरथाकडे वापस गेली तेव्हा राजाने तिला त्याचे प्राण वाचवण्याबद्दल वर मागण्यास सांगितले. कैकेयीने वेळ आल्यानंतर वर मागील असे सांगितले. त्यानंतरची कथा तर माहितीच आहे.
रामाच्या आणि इतर तीन राजकुमाराच्या जन्मानंतर कैकेयीचे जे काही वर्णन आलेले आहे ते उत्तम माता म्हणूनच आलेले आहे. रामासोबत तिचे विशेष सौख्य होते असेच सगळ्या आवृत्त्यांमध्ये सांगितले आहे. आणि रामाला सुद्धा कैकेयीप्रती विशेष आदर आणि प्रेम होता हे सुद्धा दिसून येते. असे म्हणतात कि राम आणि कैकेयी यांच्यात राजकारणाबद्दल नेहमी चर्चा होत असे आणि कैकेयीला तत्कालीन आर्यावर्तात होणाऱ्या सगळ्या घडामोडींबद्दल माहिती तर होतीच पण त्याचे दूरगामी परिणाम सुद्धा तिला समजत होते. आणि यामुळेच रामाला तिच्या कृत्यांमागचा कार्यकारणभाव समजलेला होता.त्याने तिला कधीच दूषणे दिली  नाहीत.
जेव्हा रामाला राज्याभिषेक करण्याची घोषणा झाली तेव्हाच कैकेयीला मागे केलेल्या भीषण भविष्याची नांदी मिळाली. पण ते टाळण्यासाठी नेमके काय करावे हे तिला कळत नव्हते. तेव्हा ऋषी वशिष्ठ तिच्याकडे आले. त्यांना सुद्धा भविष्य कळत होतेच की ! त्यांनी तिला मार्ग सांगितला.
"हे राणी कैकेयी, पुत्रशोकाने राजा दशरथाचा मृत्यू होणार हे तर अटळ आहेच. पण पुत्रशोक हा पुत्राच्या "मृत्यूनेच " होईल असे काही नाही. "पुत्राच्या वियोगामुळे" सुद्धा शोक होणारच. त्यामुळे मागे तुला राजाने दिलेल्या दोन वरांचा वापर करून होणारे अमंगल रोखू शकतेस. एका वराने तू भरताचा राज्याभिषेक आणि दुसर्याने रामाला १४ वर्ष माग. "
कैकेयी अवाक झाली. रामाला वनवास ? नाही. कदापि नाही. तिने नकार दिला.
पण वशिष्टांनी तिला त्यामागची भूमिका समजावली. पुत्रवियोगाने दशरथाचा मृत्यू होईल. भरत रामाऐवजी राजा होण्यास नकार देणार हे तर निश्चितच होते. १४ वर्ष राजाशिवाय राज्य ठेवणे म्हणजे परचक्रालाच आमंत्रण देणे. पण भरत रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्याचे रक्षण करेल. आणि इश्वाकू कुळाचे सुद्धा रक्षण होईल. वाईट एकाच गोष्टीचे आहे कि यासाठी तुला कलंकित व्हावे लागेल.
हे ऐकून ती मानिनी स्त्री नियतीपुढे झुकली. 
आता ज्योतिषीय घटना आणि शाप या गोष्टी बाजूला ठेवू. रामायण महाभारताकडे इतिहासाच्या दृष्टीने बघणाऱ्या काही लेखकांचे असे मत आहे कि रामाचा वनवास हा राम आणि कैकेयी या दोघांचे सुनियोजित राजकारण होते. कैकेयीला रामातल्या अद्वितीय नेतृत्व गुणांची जाण होतीच. तिच्या रामाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. महत्वाकांक्षा होत्या.
त्यावेळी आर्यावर्ताला रावणाने ललकारले होते. सुदूर दक्षिणेतल्या रावणाचा आतंक उत्तर भारतालासुद्धा त्रासदायक ठरत होता. रावणाला सगळे आर्यावर्तच गिळंकृत करायचे होते. राम राजा झाला असता आणि रावणाने युद्ध पुकारले असते तर त्याच्या बलाढ्य सेनेपुढे अयोध्येचे सैन्य तग धरू शकले नसते. आणि दंडाकारण्यापुढच्या दक्षिण प्रदेशातल्या राज्यांकडे मदत मागितली असती तरी मदत मिळेलच अशी खात्री नव्हती.कारण आत्तापर्यंत अयोध्येने कधी त्यांच्यासोबत तह,संधी किंवा विशेष संबंध प्रस्थापित केलेले नव्हते. म्हणून विस्थापित राजकुमार म्हणून जर राम त्यांच्याकडे गेला असता तर त्याला सहानुभूती मिळाली तर असतीच त्याचसोबत रावणाला संशय करण्यास काही कारण मिळाले नसते. त्यांच्यासोबत मैत्री करून संधान जुळवले असते तर अनेक राज्यांचे असे एकसंघी बलाढ्य सैन्य बनून रावणाला आवरणे शक्य होऊ शकणार होते.
शिवाय रामाला डावलून भरताला जर राज्याभिषेक केला असता तर प्रजेने बंड करण्याची शक्यता होती.प्रत्यक्ष राजा दशरथानेच जर रामाला वनवासाला पाठवून भरताला राज्य दिले तर प्रजा काही म्हणू शकली नसती. आणि कैकेयीला खात्री होती कि भरत राजा होणार नाहीच. कुठेतरी तीचेसुद्धा रक्त आणि संस्कार त्याच्यात होतेच की !
ठरल्याप्रमाणे वनवासात जाऊन रामाने तेच केले. योजनेमध्ये अनपेक्षित घटना घडली,सीतेचे अपहरण. आता मात्र रावणासोबत युद्ध करणे हाच एक राजमान्य मार्ग होता. आणि युद्ध हवेच होते. रावणाचे पारिपत्य करूनच रामराज्य स्थापन करायचे होते. रावण मारल्या गेला. संपूर्ण आर्यावर्तात रामाच्या अतुल्य पराक्रमाची दुदुंभी वाजत होती. अयोध्येत वापस आल्यानंतर रामाने सर्वप्रथम कैकेयीलाच प्रणाम केला. 

कैकेयीचा लाडका राम नुसता राजा नव्हे तर दैवत्व प्राप्त होऊन " प्रभू श्रीराम" झाला. 
पण कैकेयी ?  

रामराज्यासाठी झालेल्या युद्धरूपी यज्ञात कैकेयीने आपल्या किर्तीची आहुती आधीच दिलेली होती. मागे उरली होती ती फक्त एक कृतकृत्य, पवित्र काळीभोर राख !  


- पूर्णिमा देशमुख पुरेकर 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा