सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

धर्म, न्याय आणि कायदा

                                                   धर्म, न्याय आणि कायदा 
काही दिवसांपूर्वी परदेशात राहणाऱ्या एका तरुण  मातेचे  मनोगत वाचले. तिने आपल्या परदेशात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना "भारतीय संस्कृती आणि धर्माची" ओळख व्हावी म्हणून रामायण महाभारत यातल्या गोष्टी सांगितल्या आणि मुद्दाम टीव्ही वर येणारी महाभारत हि मालिका दाखवली. त्यातल्या अनेक प्रसंगाकडे त्या मुलांनी वेगळ्याच दृष्टीने बघितले आणि त्यांच्या त्या बालसुलभ तर्कांवर तिच्याकडे काहीच उत्तर नव्हते. उदा. जेव्हा पांडवांना खांडव वनासारखी  बंजर जमीन आणि जंगली प्रदेश राज्य म्हणून देतात तेव्हा ती म्हणाली कि "अरे रे, काय हि वेळ आली त्यांच्यावर ? तेव्हा तिचा मोठा मुलगा म्हणाला " तू अरे रे का म्हणतेस ? उलट हे तर त्यांच्यासाठी मस्त adventure आहे. challenge आहे. आयतेवायते राज्य मिळवण्यात काय मज्जा ? I would rather prefer creating my own kingdom !
हे ऐकून तिला जे वाटले ते काहीच नाही. पांडव जेव्हा सदेह  स्वर्गारोहण करतात तेव्हा एक मुलगा म्हणाला, " युधिष्ठिराला स्वर्गात का जाऊ दिले ? त्याच्यामुळेच तर त्याचे भाऊ नोकर ( दास ) बनले. द्रौपदीला अपमान सहन लागला. हे चूक नव्हते का ? मला असा राजा नाही आवडला. "
त्या मातेला काय उत्तर द्यावे हेच कळेना. कारण कुठेतरी तिला सुद्धा ते पटले नव्हतेच. पण आईबापांना अश्या अनेक "धर्मसंकटात " टाकणाऱ्या गोष्टी टाळण्याची जी कला अवगत करावी लागते ती तिनेही केलीच होती. काहीतरी  थातुर मातुर उत्तर देऊन तिने त्यांना चूप केले. असे अनेक प्रसंग तिने  सांगितले. तिची विनोदी शैली खूप आवडली. पण लक्षात राहिले ते त्या अबोध  मुलांचे विचार.
वर वर पाहता महाभारत हे हस्तिनापूरच्या राज्यावर अधिकार मिळवण्यासाठी कौरव  आणि पांडवांमधले वैमनस्य,ज्याची अखेर भीषण नरसंहारात झाली त्या युद्धाची कथा आहे असे वाटते. अनेक पाश्चात्य आणि भारतीय लेखकांनी सुद्धा हि कथा एक " जमीनजुमल्याची केस " आहे असे म्हंटले  आहे. पण ते चूक वाटते.
युद्ध घडले कारण  पांडव आणि कौरव  या दोन्ही पक्षांच्या बाजू न्याय्य होत्या.
पांडवांचे म्हणणे होते कि त्यांचे वडील पांडू हे राजा होते. त्यांनी वनात जातांना धृतराष्ट्राला "care taker " म्हणून सिंहासनावर बसवले. त्यामुळे पांडूनंतर  त्याचा मोठा मुलगा हाच खरा उत्तराधिकारी.
कौरवांचे म्हणणे होते कि ज्येष्ठ होणे हाच मापदंड मानला तर मग धृतराष्ट्र खरा ज्येष्ठ होता. आणि पांडू नंतर त्याला राजा हेच नामाभिधान दिल्या गेले होते. त्याला राजा म्हणून निर्णयस्वातंत्र्य दिल्या गेलेले होते.  त्यामुळे दोन्ही मापदंड वापरले तरी दुर्योधन हाच खरा उत्तराधिकारी.
ह्या पेचातून मार्ग काढणे ना सर्वज्ञ अश्या विदुराला जमले, ना कुलश्रेष्ठ अश्या भीष्माला. कृष्णाने पांडवांचा  पक्ष धर्माचा म्हणून त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला.
इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि "धर्म" हि संज्ञा खूप क्लिष्ट आहे. भारतीय सनातन संस्कृतीमध्ये धर्म म्हणजे न्याय असे नाही. न्याय/नीती हि खूपदा नाण्याची दुसरी बाजू ठरते.
भारतीय आणि ग्रीक/रोमन काव्यांमध्ये साम्य दाखवतांना धर्म म्हणजे justice असा जो तर्क केला आहे तोच मुळात चूक वाटतो. कारण धर्म म्हणजे न्याय असा जर अर्थ केला तर धृतराष्ट्राची  बाजू योग्य वाटते. त्याच्या  अंधत्वामुळे त्याला ज्येष्ठ असून राज्याभिषेक केला नाही. पण पांडूच्या निधनानंतर मात्र त्यालाच राजा म्हणून स्वीकारले. का बरे ? तेव्हा तो अंध नव्हता का ? त्याच्या मोठ्या मुलाला राज्यपद देणे हे न्यायसंगतच होते.
द्रौपदीवर जेव्हा जेव्हा अपमानाचे प्रसंग आले, तिच्या अब्रूवर धावा झाला तेव्हा तिचे पाचही शूर म्हणवणारे पती तिचे रक्षण करू शकले नाही. त्यांचे वागणे पतिधर्माला सुसंगत होते का ? नाही. तो अन्याय नव्हता का ?
दुर्योधनाचा वध करण्यासाठी त्याच्या जांघेवर प्रहार केले गेले जे मुष्ठी युद्धाच्या नियमांमध्ये निषेधित आहे.
निशस्त्र कर्णाचा वध सुद्धा युद्धशास्त्राच्या नियमांविरुद्धच आहे.
भीमाने आणि अर्जुनाने  नियम / कायदा पाळला का ? नाही.
असे अनेक प्रसंग आहेत जिथे अनेक व्यक्तींवर अन्याय झालेला आहे. पण धर्माची बाजू म्हणून त्या कृतींचे समर्थन केल्या गेले आहेत. यामागे एकच कारण आहे.
धर्म म्हणजे समाजाच्या हिताच्या उद्देश्याने केलेल्या कृती. व्यक्ती पेक्षा समष्टी नेहमीच जास्त महत्वाची मानल्या गेली आहे. पांडवांनी तर वारणावतचे राज्य नम्रपणे स्वीकारले होते. आणि स्वकर्तृत्वाने  ते विस्तृत देखील केले. राजसूय यज्ञ करून त्यांनी त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली. पण मत्सरी कौरवांना ते सहन झाले नाही. त्यांनी द्यूत क्रीडेमध्ये त्यांना हरवून त्यांचे सगळे काही  बळकावले आणि पुन्हा त्यांना देशोधडीला लावले. द्यूतक्रीडा हि जरी द्वापारयुगातल्या राजधर्माला मान्य होती तरी सुद्धा त्यामागचा हेतू  हा पारमार्थिक  नसून पूर्णपणे स्वार्थाने बटबटलेला होता. आणि म्हणूनच कौरवांची बाजू धर्माची नव्हती असेच सगळ्यांना वाटले.
हिंदू धर्मामध्ये  बदल  होत आलेत, होतील हि. ज्या गोष्टी त्रेता युगात धर्म संमत नव्हत्या त्या द्वापार युगात धर्म म्हणून  प्रचलित झाल्या. कलियुगात त्यात आणखीन बदल घडले.
धर्म,न्याय,रूढी आणि  कायदा या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांना एकाच पारड्यात तोलता येत नाही. ज्या गोष्टी धर्मसम्मत आहेत त्या कायद्याला स्वीकार असतीलच असे नाही. काही कायदे हे न्याय्य ठरतीलच असेही नाही. धार्मिक नियम आणि रूढी परंपरा यामध्ये खूपदा तफावत दिसून येते. उदा. स्त्रीला शिकवू नये हि रूढी प्रचलित होती. पण प्रत्यक्षात हिंदू धर्मात असे कुठेच म्हंटलेले नाही. सीता आणि अनेक ऋषीकन्या वेदशास्त्र पारंगत होत्या. गुरुकुलामध्ये सुद्धा मुलंमुली दोघेही एकत्रच शिकत असत. तशी वर्णने सुद्धा काव्यांमध्ये आहेत.
नरबळी आणि पशुबळी हि संकल्पना वेदकाळात प्रचलित होती. पण विश्वमित्र ऋषींनी त्या दोन्हीचा निषेध केला. विरोध केला. आणि त्या अन्यायी प्रथा बंद झाल्या. धर्माने सुद्धा हा बदल स्वीकारला. नरबळी देणे हे पाप समजल्या जाऊ लागले.
सामाजिक हितासाठी कालानुरूप बदल स्वीकारणे, नवीन नियम लागू करणे, जुन्या नियम रूढींचा त्याग करता येणे हा हिंदू धर्माचा सगळ्यात महत्वाचा भाव आहे. देवांनी जे अवतार घेतले त्यात सुद्धा म्हणूनच उत्क्रांती चे सिद्धांत दिसून पडतात. धर्म कठोर वाटतो कारण मनुष्य प्राण्याला नियमांचे बंधन झुगारून मनस्वीपणे जगता येण्याचे आकर्षण असते. पण असे घडले तर समाजात अनाचार घडेल. हिंदू धर्म कट्टर नाही. तो लवचिक आहे . म्हणूनच त्यात समाजाच्या आणि काळाच्या गरजांप्रमाणे स्थित्यंतर घडत आले. पुढेही घडत राहिल.
आणि त्याचमुळे  हिंदू धर्म हा शाश्वत आहे.
" धर्मो रक्षति रक्षित: I
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा