मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

आंधळं पालकत्व , अज्ञानी पुत्रत्व

                  आंधळं पालकत्व , अज्ञानी  पुत्रत्व 
 इंटरनेटच्या माहिती जाळामध्ये अनेकदा प्रस्थापित संकल्पनांना छेद देण्याऱ्या पोस्ट येतात. विषयसंबंधित तीन पोस्ट मनात ठसल्या.
पहिली पोस्ट होती एका आईच्या "confession " बद्दल. त्यात ती म्हणते कि "आज मी मोकळेपणाने मनातलं खरं खरं सांगते. मुले आता मोठी,जाणती झालेली आहेत. या गोष्टी मी फक्त आई आहे म्हणून करायलाच हव्यात, नव्हे, मला तसेच वाटायला हवे असा जो पूर्वग्रह सगळ्यांच्या मनात आहे तो मला मान्य नाही. या नंतर ती अनेक गोष्टीबद्दल बोलते. उदा. आईच्या खाण्यातील घास मुलाला द्यायलाच हवा, आईने मुलांसाठी त्याग करायलाच हवा, नवऱ्याच्या आधी मुलांना प्राधान्य द्यायला हवे, आईला सगळे माहिती असते, आई म्हणजे देव, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ, आई कधी चुकूच शकत नाही या सारख्या अनेक गोष्टीबद्दल तिने खूप निर्भीडपणे लिहिले. शेवटी ती म्हणाली कि " आई माणूसच असते. आणि चुका करणे, चुका होणे कुठल्याच मनुष्याला चुकले नाही. मला देवपण नको. माणूस म्हणूनच वागवा. नाहीतर मनाविरुद्ध लादलेल्या या देवत्वाच्या ओझ्याखाली मी गुदमरून जाईन."
    या संदर्भात मी माझे स्वतःचेच उदाहरण देते. मला लहान बाळांचे काही करण्याची कधी वेळ आलीच नाही. जेव्हा मी स्वतः आई झाली तेव्हा मला अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. माझ्यासाठी ते नवीनच होते. उलट माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त सवय होती.कारण त्याने त्याच्या लहान भाऊबहिणींच्या मुलांना सांभाळण्याचे काम केलेले होते. पण तरीसुद्धा स्वतः आईवडील बनल्यानंतर जी एक जबाबदारी येते,एक बंधन येते , त्याने तो सुद्धा दबकूनच गेला होता. मुलांच्या बाबतीत निर्णय घेतांना एक प्रचंड दडपण येते. आपला निर्णय प्रत्येक वेळी योग्यच ठरेल असा दंभ मी तरी पाळत नाही. हा, माझा हेतू चांगला होता असे म्हणू शकते, पण निष्पक्षपणे पाहणाऱ्याला कदाचित ते चुकीचे वाटू शकते. कोणी सांगावे उद्या मुलांनाच आमचे काही चुकले असेही वाटू शकते. मुलांना तसे मला स्पष्ट सांगता यावे, आमच्यात तसा मोकळा संवाद व्हावा असे मात्र निश्चितपणे वाटते. माझ्या आईवडिलांसोबत माझे आणि माझ्या बहिणीचे असेच मोकळे नाते असल्यामुळे वाद असले , मतमतांतरे असली तरीसुद्धा आता समानतेच्या पातळीवर आमचे नाते आहे हे मी अभिमानाने सांगू शकते.
या उलट काही पालक " कुमाता न भवति " या भ्रमात अजूनही जगत आहेत. आम्ही आईवडील आहोत, चुकूच शकत नाही, असे छातीठोकपणे सांगत असतात, आणि आपल्या पालकत्वाच्या ओझ्याखाली मुलांना दडपून टाकतात. मातापित्यांच्या आदर्शत्वाच्या कल्पनेला छेद देणारे अनेक दाखले आपल्या पुराणांमध्ये सापडतात. वडील म्हणून दशरथ ,जनक, धृतराष्ट्र, ययाती, शंतनू  चुकले नाहीत का ? गांधारी तर डोळे असून आंधळी झाली आणि मुलांना डोळसपणे वाढवण्यात अपेशी ठरली. आपल्याच महत्वाकांक्षांपायी मुलांचा बळी देणारे कितीतरी पालकांचे उदाहरणं सापडतात.
दुसरी पोस्ट होती " बधाई हो " सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेली. आश्चर्य म्हणजे ती पोस्ट एका लेखकाने लिहिलेली होती. त्यात त्याने म्हंटले होते कि हा सिनेमा अनेक मुलांना,पुरुषांना आवडला नाही. कारण त्यात आई वडील हे माणूस आहेत, त्यांच्यासुद्धा खाजगी भावना असू शकतात हे नायक जसा मान्य करण्यास तयार नसतो, अजूनही भारतीय समाजातल्या पुरुषांची आणि अनेक स्त्रियांची तशीच मानसिकता आहे.
   मुले,घरदार आणि नोकरी या सगळ्यात नवराबायको इतके बुडून गेले आहेत कि त्यांना एकमेकांसाठी वेळ देणे अशक्य झाले आहे. " माझ्या नवऱ्याची बायको" या सिरीयल मधला नायक म्हणतो कि " माझी मैत्रीण आणि प्रेयसी होती ती संसाराच्या रगाड्यात कुठेतरी हरवून गेली. बायको सुद्धा राहिली नाहीस. कायम तू मुलाची आई,किंवा सून म्हणूनच समोर येतेस. " अर्थात बायको सुद्धा नवऱ्याला हेच म्हणू शकते. अनेक नवरे बायकोला कपडालत्ता,दागदागिने देऊन स्वतःचे नवरा म्हणून कर्तव्य पार पाडल्याचा अविर्भाव मिरवीत असतात. बायकोसोबत बोलायचे म्हणजे  बाहेरच्या आणि घरातल्या कटकटीचा राग काढण्यापुरते तोंड उघडतात. जवळीक फक्त शारीरिक नाही तर संवाद करणे, सोबत राहणे एकमेकांसोबत काही क्षण साजरे करणे हे सुद्धा अभिप्रेत असते. पण तसे होत नाही. बरं जे असे काही करायला जातात त्यांना " काय हे विचित्र चाळे , मुलाबाळांना सोडून कसे काय बाहेर फिरायला जाऊ शकतात " असले टोमणे ऐकावे लागतात.
तिसरी जी पोस्ट होती त्यात एकच वाक्य सगळे काही बोलून गेले,  " विवाहित मुलीच्या संसारात जसे आईने  दखल, लुडबुड करायला नको तसेच विवाहित मुलाच्या  सुद्धा संसारात त्याच्या आईने दखल , लुडबुड करायला नको."
भारतीय संस्कृतीने आईवडिलांना "देवतुल्य " मानले आहे. कारण मनुष्याला या संसारात आणण्यापासून त्याचे पालनपोषण करणे आणि रक्षण करणे, शिक्षण, संस्कार  देणे हे सगळे आईवडीलच तर करतात. प्रसंगी स्वतः उपाशी राहून , कष्ट, हालाअपेक्षा सोसून आपल्या मुलांचे भविष्य मात्र उज्ज्वल करतात. त्यामुळेच मातृदेवोभव, पितृदेवोभव,आचार्यदेवो भव असे बाळकडू पिढ्यानपिढ्या आपल्याला मिळत गेले आहे. आणि ते सत्यच आहे.आपल्या मातापित्यांची सेवा सुश्रुषा करणे हे प्रत्येकच मुलामुलींचे कर्तव्य आहे.त्यांनी केलेल्या प्रेमाचे ऋण कधीच फेडू शकत नाही हे देखील निर्विवाद सत्य आहे.
पण या सगळ्यात आपण आपले आई वडील हे सगळ्यात प्रथम माणूस आहेत हेच मुळात विसरून जातो.आणि त्याचमुळे मुलांच्या पलीकडे सुद्धा काही जग आहे हे मुलांना तर लक्षात येतच नाही पण बहुतेक आईवडील सुद्धा विसरून जातात. आणि मग एक विचित्र चक्रात सगळे अडकून जातात. पहिले मुलांना ७ ते ९ वर्षाच्या वयात गुरुकुलात पाठवून द्यायचे. विद्याभ्यास संपवून मुले गृहस्थश्रमात प्रवेश करायचे. लग्नानंतर मुलाला  मुलगा झाल्यानंतर आई वडील "त्यांच्या" गृहस्थाश्रमातून निवृत्ती घेऊन संन्यासाश्रम स्वीकारायचे. यात अपेक्षा अशी होती कि पुढ्च्या पिढीच्या  हातात सूत्रे सोपवून  मनुष्याने समाजाचे ऋण फेडण्यासाठी वेळ द्यावा. जेणेकरून मनुष्य सांसारिक मोहापासून दूर होईल आणि यामुळे दोन पिढ्यांमधील संघर्ष सुद्धा टाळला जातो. पण कालानुरूप हे धर्माचरण लुप्त झाले. आणि घराघरांमध्ये भांडे वाजायला लागली.
एका समाजशास्त्रज्ञाचे मत आहे कि ९० टक्के कौटुंबिक कलह हे मुलामुलींच्या आईवडिलांमुळेच निर्माण होतात. पुरुषप्रधान व्यवस्था जरी ह्यासाठी फक्त "सासूसुनेचा वाद " यालाच जबाबदार धरत असली तरी अनेक संघर्ष हे मुलगा आणि वडील यांच्यात आपले वर्चस्व, सत्ता,कर्तृत्व स्थापित करण्याच्या सुप्त महत्वाकांक्षा यामुळे सुद्धा होतात. प्रत्येक वेळी मुलाने वेगळे घर केले याचा अर्थ सासूसुनेचें पटत नव्हते असा होत नाही. याचे उत्तम चित्रण रेखा,अनुपम खेर अभिनित "संसार" या सिनेमा मध्ये केल्या गेले आहे. फक्त पितापुत्रांमधल्या या संघर्षाकडे समाज कानाडोळा करतो. कित्येक पालक आम्ही मोठे म्हणून आमचाच अनुभव कामाचा आहे, आमचाच सल्ला घ्यायला हवा या अट्टाहासापायी घरात आकांड तांडव करतात. आधीची पिढी जरी अनुभवी असली तरी पुढच्या पिढीतल्या समस्यांच्या वेळी तोच अनुभव कामी पडेल असे जरुरी तर नाही ना ? नवीन काळाची नवीन समस्या असेल तर कधी कधी उपाय सुद्धा नवीनच लागतो.
  बापाचा जोडा मुलाला होऊ लागला कि त्याला मित्रत्वाच्या नात्याने राहावे असे संस्कृत सुभाषित आहे. आईवडिलांना एकेरी हाक मारा अथवा अहोजाहो करा, डोळस पालक आणि सुज्ञ मुलेच या आद्य नात्याला सुंदर रूप देऊ शकतात.

-  पूर्णिमा देशमुख पुरेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा