सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

स्वाभिमानी,बाणेदार सीता

स्त्री असली तरी स्वाभिमानासोबत तडजोड का करू ? - 
सीतेचा बाणेदार प्रश्न 
धोब्याने घेतलेल्या संशयावरून आदर्श राजा रामाने गरोदर पत्नीचा त्याग केला.ते सुद्धा तिच्या तोंडावर सांगण्याची हिम्मत न करता. लक्ष्मणावर सीतेला वनविहार करण्यासाठी नेण्याचे आणि मग तिथेच सोडून येण्याचे कार्य सोपवून स्वतःला सोडवून घेतले. सीतेला जेव्हा हे कळले तेव्हा तिला किती मोठा धक्का बसला असेल ? तरीसुद्धा तिने ना लक्ष्मणाला पुन्हा अयोध्येला नेण्याच्या विनवण्या केल्या ना रामाला काही दोष दिला.तिने लक्ष्मणाकरवी रामासाठी फक्त एक निरोप पाठवला.
"आदर्श राजाने प्रजाहिताकडे दुर्लक्ष करून स्वतःला खोलीत कोंडून घेणे शोभत नाही. बाहेर येऊन आपल्या राजधर्माचे पालन करा."
या निरोपामागचा उपहास कोणाला कळणार नाही ? रामाने सीतेचा त्याग करतांना कदाचित हा विचार केला असेल कि ज्याप्रमाणे नवऱ्याने सोडलेल्या स्त्रिया आपल्या माहेरी जातात त्याप्रमाणे सीता सुद्धा माहेरी जाईल. तिथे ती सुरक्षित राहील. पण तसे झाले नाही. उत्तररामचरित्रात सुद्धा कौसल्येच्या मनात सीतेला सोडून दिल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी जनक अयोध्येयवर स्वारी करेल का अशी भीती सारखी घर करून असल्याचा उल्लेख आहे. पण जनकाने तसे काही करणे तर दूरच रामाला साधा जाब सुद्धा विचारला नाही. सीतेला सुद्धा हे अपेक्षितच  होते. म्हणूनच ती माहेरी वापस गेली नाही. तिला हेही माहिती होते कि आपला पिता जनक हा सुद्धा आदर्श राजा म्हणवून घेण्यासाठी पतीने टाकून दिलेल्या मुलीचा स्वीकार करणार नाही . बहुतांश मातापिता असेच तर करतात ना ?
एकदा लग्न करून दिले कि मुलीला आपल्या मातापित्यांचे घर परके होते. माहेरी भाऊ असतो, त्याचा स्वतःचा संसार असतो. भावाच्या बायको सोबत खटके उडतात.सगळ्यांनाच समाजाचे टोमणे , टीका सहन करावी लागते. जिणे नकोसे होऊन जाते. असेही मातापिता आहेत जे माहेरी वापस आलेल्या मुलीला म्हणतात कि " अशी टाकून दिलेली म्हणून जगण्यापेक्षा तू मेली असतीस तर बरे  झाले असते, अशी नामुष्कीची वेळ तर नसती आली . "
मग त्या मुली आत्महत्या करून संसारत्याग करून टाकतात. ज्या हे करत नाहीत त्यांना जगण्यासाठी पैसे हवे  म्हणून नवऱ्याकडून पोटगी मिळवण्यासाठी केस लढवावी लागते,मुलांच्या custody साठी सुद्धा भांडणे करावी लागतात. संसाराची लक्तरे समाजासमोर उघडी पडतात.
सीतेने असे काही केले नाही. ना ती माहेरी गेली ना तिने देहत्याग केला. कसा करणार ? पोटी मुलं वाढत होती. त्यांच्या प्रति तिचे कर्तव्य नव्हते का ?
लक्ष्मण अयोध्येला वापस गेल्यानंतर सीता त्या अरण्यात मार्ग काढत काढत वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात पोहोचली. त्यांनी तिचे स्वागत केले.तिची कहाणी ऐकल्यानंतर तिथेच राहण्यास सुचवले. लव कुश जन्माला आल्यानंतर सुद्धा सीता तिथेच राहिले. मुलांचा जन्म झाल्यानंतर सीतेने वाल्मिकी ऋषी सोबत आपल्या मुलांना रामाकडे का पाठवले नाही ? रामाच्या पितृत्वाबद्दल तर काही शंका नव्हती. पण स्वाभिमानी सीतेने तसे केले नाही. रामाने जेव्हा तिचा त्याग केला तेव्हा त्याला ती गरोदर आहे हे माहिती होते. तरीही त्याने तिला सोडले. कुठेतरी सीतेला हे खटकले होते. मुलांचे संगोपन करून त्यांना क्षात्रधर्म शिकवण्याचे कार्य तिने उत्तमपणे केले. ते सात वर्षांचे होते जेव्हा रामाने राजसूय यज्ञ  केला. यज्ञाचा घोडा लवकुशानी अडवला. घोडा सोडवण्यासाठी अयोध्येहून आलेल्या प्रत्येक वीराला त्यांनी आपल्या पराक्रमाने पराभूत केले. प्रत्यक्ष रामच जेव्हा तिथे आला तेव्हा मात्र सीतेने वाल्मिकीना पाठवून लवकुशांना संदेश दिला कि राम  तुमचा पिता आहे  म्हणून पित्याला पराभूत करण्याचे पाप करू नका.लवकुशांनी घोडा सोडून दिला. त्यानंतर राजसूय यज्ञ समापनाच्या  दिवशी लवकुश वाल्मिकीसोबत अयोध्येला गेले. रामायणाचे आख्यान गेले. वाल्मिकींनी रामाला जेव्हा लवकुश तुमचे मुलं आहेत हे सांगितले तेव्हा रामाच्या मनातले वात्सल्य आणि पुत्रमोह जागा झाला. "मी फक्त मुलांना स्वीकारतो " असे कसे म्हणणार ? त्याने सीतेला अयोध्येत पुन्हा येण्याचा आग्रह केला. हे कळल्यावर सीता तिथे आली. मुलांना रामाने स्वीकारले होतेच.त्यांचे भविष्य सुरक्षित झाले होते. सीतेलाही तो मोठ्या (?) मनाने स्वीकारायला तयार झाला होता. पण स्वाभिमानी सीतेने रामासोबत पुन्हा संसार करण्यास ठाम नकार दिला.
"धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि " असे वचन रामाने सप्तपदी समयी दिले होते. एकवचनी रामानेच ते वचन मोडले होते. तिच्या चारित्र्याबद्दल ज्या शंका लोकांच्या मनात होत्या त्या शंकांना रामाने तिचा त्याग करून दुजोराच दिला होता. पितृ आज्ञेनुसार राज्य सोडणे रामाला जमले. पण समाज त्याच्या बायकोवर लांछन लावत असतांना तो तिच्या बाजूने ठामपणे का उभा राहिला नाही ? राज्य सोडून तो सुद्धा तिच्या सोबत वनवासात का नाही गेला ? नवरा म्हणून तिच्या प्रति त्याचे कर्तव्य नव्हते का ?
सीता आणि द्रौपदी यांची तुलना करतांना सीता नेहमीच अगतिक, करुण , नशिबाचे तडाखे निमूटपणे सहन करणारी अशी दाखवतात. आणि द्रौपदी अन्यायाविरुद्ध लढणारी  अशी दर्शवतात. काही लेखक असे म्हणतात कि सीतेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. वनवासात जाण्याचा निर्णय तीचा , लक्ष्मणरेखा ओलांडण्याचा निर्णय तिचाच होता. त्याचमुळे तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगांना ती स्वतःच जबाबदार आहे असे जे म्हणतात ते जरी खरे असले तरी तिने निर्णयांची जबाबदारी तर घेतलीच पण त्यांच्या परिणामांनाही ती धाडसाने सामोरी गेली आहे.
तिला टाकून देण्याचा निर्णय रामाचा होता. मुलांना आणि सीतेला पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय हि रामाचाच होता. पण या वेळी मात्र सीता त्या निर्णयाविरुद्ध गेली.
बाणेदारपणे तिने रामाला धिक्कारले. अग्निदिव्य करतांना एकदा तिचे स्वत्व पणाला लावले होते. पण पुन्हा नाही. ती भूमिगत झाली. कुठे गेली ते कुणालाच कळले नाही. मला वाटते कि जिथे मानाने , स्वाभिमानाने जगता येईल असे जग तिने निर्माण केले. तिथेच ती राहिली. परित्यक्ता अश्या असंख्य स्त्रियाना  तिने मानाने जगण्याचा  मार्ग दाखवला.स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आदर्श घालून दिला.एकटी स्त्री सुद्धा मुलांचे संगोपन उत्तमपणे करू शकते हे सिद्ध करून दाखवले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे  "मर्यादा पुरुषोत्तम "रामाच्या त्या तेजस्वी पत्नीने स्वाभिमानाला तडा जाईपर्यंत सहन करू नये अशी मर्यादा आखून दिली.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा