गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

शिखंडीची घुसमट

स्त्री किंवा पुरुष नव्हे तर "योद्धा" म्हणून माझे नाव का नाही घेत ? - शिखंडीची घुसमट 
  महाभारतकालीन आणि त्या पूर्वीच्याहि समाजामध्ये नपुंसक मनुष्यांबद्दलचा दृष्टीकोण आजच्या पेक्षा फारच प्रगल्भ होता. तसे तर एकूणच लैंगिक संबंधांबद्दल, स्त्री पुरुषांच्या विविध नात्यांचा धर्माने उल्लेख केला आणि त्यांना संमती सुद्धा दिली होती . नियोग पद्धती, स्त्रीचा पुनर्विवाह, बहुपतित्व , पत्नीच्या विवाह पूर्व संततीला विवाहानंतर पतीने स्वीकारणे हे सगळे धर्मसम्मतच होते.
परंतु कलियुगात मात्र जिथे स्त्री बद्दलच पुरुषप्रधान समाजाने अनैसर्गिक, अमानवी आणि अन्यायी नियम धर्माच्या नावाखाली सर्रास सर्वमान्य केले तिथे "नपुंसक" असलेल्या समाजाच्या एका छोट्याश्या समुदायाबद्दल अत्यंत हिडीस आणि अमानुष धारणा पसरवल्या गेल्या त्यात नवल ते काय ?
महाभारतातल्या शिखंडीची घुसमट यापेक्षा वेगळीच आहे. अंबेचा शिखंडी होण्यापर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण काही गोष्टी अश्या आहेत ज्या एकतर हेतुपुरस्सर सांगितल्या गेल्या नाहीत किंवा तेव्हढ्या महत्वाच्या वाटल्या नाहीत.
१. शिखंडीच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली कि या "मुलीचे " संगोपन "मुलाप्रमाणे " करावे. त्या प्रमाणे द्रुपद राजाने शिखंडीला सर्वोत्तम असे  अस्त्र -शस्त्र  ज्ञान , युद्धकौशल्य आणि क्षात्रधर्म शिकवला. शिखंडी उत्तम योद्धा होता.
२. शिखंडीचे लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री जेव्हा त्याच्या पत्नीला त्याचे सत्य कळले तेव्हा ती घाबरून चिडून आपल्या पित्याकडे वापस गेली. ती दशार्ण देशाचा  राजा हिरण्यवर्ण याची मुलगी होती. राजाने संतापाने द्रुपदावर आक्रमण करण्याचे ठरवले. यामुळे अपमानित आणि व्यथित होऊन  शिखंडी आत्महत्या करण्यासाठी जंगलात  गेला. तिथे "स्थुन कर्ण " नामक यक्षाने त्याच्यावर दया करत शिखंडीला त्याच्या मृत्यूपर्यंत  त्याला पौरुषत्व दिले. शिखंडी मेल्यानंतर यक्षाला त्याचे पौरुषत्व वापस मिळाले.
३. पौरुषत्व मिळाल्यानंतर शिखंडी पत्नीकडे गेला. त्यांचे वैवाहिक जीवन सुरु झाले. त्याला एक पुत्रही झाला.
४.  महाभारताच्या युद्धाच्या वेळेपर्यंत शिखंडीचे " पौरुषत्व  " सिद्ध  झालेले होते. युद्धाच्या सुरुवातीलाच जेव्हा युद्धाचे नियम ठरवल्या गेले तेव्हाच कोण वीर कोणाकडून लढणार याची यादी ठरत असे.ती यादी शत्रुपक्षाला सुद्धा दिल्या गेली होती. शिखंडी पांडवांकडून लढणार हे पक्के झाले तेव्हा त्याबद्दल कोणीच आक्षेप घेतला नाही.
त्यामुळे भीष्मांना धारातीर्थी पाडण्यासाठी शिखंडीला जेव्हा उभे केले तेव्हा त्यावेळी भीष्मांना आक्षेप घेण्याचा काहीएक अधिकार नव्हता. त्यातही भीष्माचा भाऊ "विचित्रवीर्य " नावाप्रमाणेच  संतति उत्पन्न करण्यास असमर्थ होता, खुद्द पांडू सुद्धा तसाच होता. हे दोघे केवळ पुरुष म्हणून जन्माला आले म्हणून  त्यांचे योद्धा असणे भीष्माने स्वीकारले ? आणि स्त्री म्हणून जन्माला येऊन लिंग परिवर्तन करून पुरुष झालेल्या शिखंडीला तो मान का नाही दिला ?
युद्धाचा नववा दिवस उगवला. आत्तापर्यंत भीष्मांनी पांडवांच्या सेनेचा चांगलाच दारुण पराभव केला होता. विजयाचे पारडे कौरवांकडे झुकत होते. त्यातच अर्जुनाने " मी भीष्म आणि द्रोणाचार्यांवर बाण चालवणार नाही असे जाहीर केले. कृष्ण चिडला. भीष्मांना धारातीर्थी पडणे अत्यावश्यक होऊन बसले होते. कृष्णाने शिखंडीचे नाव सुचवले.
" पण शिखंडी स्त्री आहे , भीष्म एका स्त्रीसोबत युद्ध करणार नाही . हे धर्मसम्मत नाही. " युधिष्ठिराने तात्विक वाद केला. ( इथे प्रश्न पडतो कि हि बाब ९ दिवसापर्यंत युधिष्ठिराने सोयीस्करपणे दुर्लक्षित का केली ? म्हणजे असे होते का कि नऊ दिवस शिखंडी लढलेला चालला पण त्या दिवशी नाही ? )
" कुठला धर्म असे म्हणतो ? आणि धर्माची गोष्ट करायची तर भीष्मांने कुठला  धर्म पाळला ? धर्म म्हणतो कि २ पिढ्या पाहून झाल्यानंतर व्यक्तीने वानप्रस्थ स्वीकारावा.गृहस्थ धर्माचा त्याग करावा. निवृत्ती घ्यावी. पण भीष्माने  पित्याच्या स्त्रीमोहासाठी स्वतः ब्रह्मचारी राहून धर्माचा नियम तोडला. त्याला इच्छामरणाचे वरदान दिले तरी तो चार चार पिढ्या  बघे पर्यंत जिवंत राहिला. असे करून त्याने पृथ्वीवर भार  टाकला. त्याच्या या कृत्यामुळेच पुढचा सगळा नाट्यक्रम घडला. भीष्माचा अंत व्हायलाच हवा.  " कृष्णाने युधिष्ठिराला सुनावले.
ठरल्याप्रमाणे शिखंडी रथावर आरूढ झाला. प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच त्याचे सारथ्य केले. शिखंडीच्या मागे अर्जुन सज्ज होता. भीष्मांनी शिखंडीला बघितले  तेव्हा ते संतापले.
"कृष्णा , तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी एका स्त्रीला सामोरे केलेस ? मी स्त्री सोबत लढणार नाही. हा धर्म नाही. "
" धर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडी शोभत नाहीत पितामह भीष्म. तुम्हाला शिखंडी मध्ये एक स्त्री दिसते आहे जी पूर्वजन्मी अंबा होती. पण मला मात्र इथे एक मनुष्य  दिसतो आहे ज्याने पुत्राला जन्म देऊन आपले "पौरुषत्व" सिद्ध केले आहे. तुमच्या समोर एक योद्धा उभा आहे, युद्ध करा." कृष्णाने आव्हान दिले.
"नाही. हे धर्माला अनुसरून नाही. मला हे पटत नाही ! " भीष्मांनी प्रतिवाद केला.
" तुम्हाला पटत नाही ? तुमचे मत आहे म्हणून तो धर्म ठरत नाही भीष्म पितामह. आजपर्यंत कितीदा तुम्ही कुरुकुलाचा वंशविस्तार करण्यासाठी अधर्माची कास धरलेली आहे ? तुमचा भाऊ "विचित्रवीर्य" जो स्वतःच नपुंसक होता त्याच्या साठी तुम्ही ३ राजकन्यांचे बळजबरीने अपहरण केले. तो धर्म होता का ? त्या नंतर हि चार चार पिढ्या होईपर्यंत तुम्ही एखाद्या जळवा प्रमाणे जिवंत राहिले. निवृत्ती घेतली नाही ते धर्माला  अनुसरून होते का ? तुमच्याच कुळातल्या एका सुनेवर अत्याचार होत असतांना तुम्ही चूप राहिले, स्वतःचे क्षत्रियत्व विसरले , तेव्हा कुठे होता तुमचा धर्म ? युद्ध करा नाहीतर माघार घ्या. " कृष्णाची वाणी कडाडली.
"मी लढणार नाही. मी शस्त्र खाली ठेवतो. " भीष्मांनी युद्ध टाळण्यासाठी शस्त्र ठेवले.
" शिखंडी , अर्जुना , धनुष्य उचला, बाण चालवा. या वृद्ध मनुष्याला ठार करा. "
"पण कृष्णा , ते माझे पितामह आहे. वडीलधारे आहेत." अर्जुनाने पुन्हा कच खाल्ली.
आता मात्र कृष्णाचा संयम सुटला. त्याने अर्जुनाला निर्वाणीचा इशारा दिला.
" अर्जुना , हे युद्ध ना पिता पुत्रांचे आहे ना स्त्री पुरुषांचे . हे युद्ध आहे धर्म-अधर्माचे . धर्म म्हणजे समान न्याय. धर्मासमोर स्त्री असो पुरुष असो किंवा नपुंसक असो, सगळे समान असतात. धर्माचे पालन म्हणजे अंगी इतरांबद्दल करुणा , सहृदयता असणे. भीष्माच्या अंगी ती आत्ताही नाही आहे. शिखंडीकडे एक  योद्धा म्हणून न बघता ते अजूनही एक नपुंसक म्हणूनच बघत आहेत.
योद्धा कुणीही असू शकतो अर्जुना .  युद्धभूमी स्त्री पुरुष असा भेद करत नाही. असे असते तर प्रत्यक्ष 
 "आदिशक्ती " असुरांचा नाश करण्यासाठी युद्ध भूमीत उतरली नसती. सत्यभामाने नरकासुराचा वध केला नसता. शिखंडी , ज्या भीष्मामुळे अंबेच्या आयुष्याचे दशावतार झाले त्या भीष्माला मार , चालव बाण. "
शिखंडीने बाण चालवले. असे म्हणतात कि शिखंडीच्या बाणांनी भीष्माला काहीच झाले नाही. अर्जुनाच्या बाणांमुळे ते धारातीर्थी पडले.कदाचित हे शिखंडीचे महत्व कमी करण्यासाठी, अर्जुनाला वीर ठरवण्यासाठी आणि भीष्मांचे अजेयत्व सिद्ध करण्यासाठी कोणीतरी घुसडवले आहे असे वाटते.
भीष्म तसेही कुणाच्या बाणांनी मरणार नव्हतेच. त्यांची इच्छा होईल तेव्हाच त्यांचा मृत्यू होणार होता. बाण, मग ते कुणाचेही असो, निमित्तमात्र होते.
भीष्म खाली पडले पण पृथ्वीने त्यांचा स्वीकार केला नाही कारण त्यांनी इतके वर्ष जगून निसर्गा विरुद्ध वर्तन केले होते. स्वर्ग त्यांना स्वीकारत नव्हता कारण त्यांनी लग्न करून संतानोत्पत्ती केली नव्हती. पितृऋण फेडले नव्हते. महायोद्धा भीष्म त्रिशंकू अवस्थेत ६ महिने खितपत पडले. त्या महान क्षत्रिय कुरुश्रेष्ठाचा मृत्यूसुद्धा वीरोचित झाला नाही.
शिखंडी मुळे विजयाचे पारडे पांडवांकडे झुकले. शिखंडीचा वध अश्वत्थामाने तो  झोपेत असतांना केला.
आजही शिखंडी सारखेच अनेक आहेत जे स्त्री पुरुष भेदाच्या सीमारेषेवर जगत आहेत. समाज त्यांना तिरस्कृत करतो. का ? असे अनेक आहेत जे या भेदाच्या पलीकडे जाऊन अनेक भूमिका यशस्वीपणे निभावत आहेत. नोकरी व्यवसाय करण्यात अग्रेसर आहेत. पण कित्येकांना आजही समाज भयाने आपले "sexual  orientation लपवून ठेवावे लागते.
खरेतर कुणाच्या लैंगिक प्रवृत्ती कश्या आहेत ही ज्याची  त्याची  "खाजगी " बाब आहे. जो पर्यंत कुणाच्या या प्रवृत्ती मुळे अन्य व्यक्तीला त्रास होत नाही आहे तो पर्यंत समाजाला त्यात दखल देण्याची काहीच गरज नाही.
कलम ३७७ रद्द झाले. कायद्याने शिखंडीला न्याय दिला. पण समाजाचे काय ?
आजही शिखंडी " महाभारतातला एक योद्धा " या मानाच्या पदवी साठी झगडतच आहे.शिखंडीला तो जसा आहे तसाच स्वीकारणारा  फक्त आणि फक्त धर्मस्थापक कृष्णच आहे. बाकीच्यांचे काय ?
 शिखंडीची घुसमट कधी संपणार ?

- पूर्णिमा देशमुख पुरेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा