मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

माधवीचा विलाप-स्त्री चा सौदा करणे धर्मसम्मत कसे काय ?

स्त्री चा सौदा करणे धर्मसम्मत कसे काय ? - माधवीचा विलाप 
ययातिची मुलगी माधवी , रुपसंपन्न तर होतीच पण अतिशय विनम्र , संवेदनशील आणि गुणसंपन्न होती. तिच्या पत्रिकेत असे लिहिले होते कि ती चार सम्राटांची माता होईल. पण प्रत्येक प्रसूती नंतर ती पुन्हा कुमारीच राहील.
विश्वामित्रांचा एक शिष्य होता गालव. तो ज्ञानी तर होता परंतु त्या ज्ञानाने अहंकारी बनला. त्याने विश्वामित्रांना गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारले. त्याची गरीब परिस्थिती विश्वामित्रांना  ठाऊक होती. त्यांनी त्याला दक्षिणा देऊ  नको असे सांगितले. पण गालव हटूनच बसला. मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायचीच आहे , काय देऊ  सांगा असे वारंवार विचारू लागला. शेवटी विश्वामित्रानाही राग आला. आपला शिष्य अहंकाराने उन्मत्त झाला आहे, त्याचा अहंकार उतरवण्यासाठी त्यांनी त्याला सांगितले कि "तू मला गुरुदक्षिणा म्हणून ८०० शुभ्र वर्णी परंतु एक कान  काळा असलेले घोडे आणून दे. हे ऐकून गालव हादरला. एकाच वेळी एका राजाकडे एव्हढे सारखे घोडे असणे शक्यच नव्हते. काय करावे ?
गालव तेव्हा चक्रवर्ती सम्राट ययाती कडे गेला.त्याला असे घोडे देण्याची याचना केली. ययाती कडे तसा एकसुद्धा घोडा नव्हता. पण याचकाला रिकाम्या हाताने कसे पाठवावे ? ययातिची अपकीर्ती झाली असती. ययातीने "घोड्यांच्या" बदली आपली "कन्या" गालवांना "दान " केली. तिच्या कुंडलीतील योग  सांगितला. आणि गरीब गालवांसोबत माधवी निमूटपणे राजमहाल सोडून चालली गेली. प्रत्यक्ष जन्मदात्यानेच तिचा पहिला "सौदा" केला. हा तिच्यावर पहिला आघात होता.
गालवने माधवीचा  स्वीकार एका धूर्त विचाराने केला. तिच्या कुंडलीतील योग्  पाहून त्याने तिला तीन  वेगवेगळ्या राजांकडे एक एक वर्षासाठी पाठवले. माधवीने त्या राजासोबत एका वर्षासाठी रममाण व्हावे, पुत्र जन्माला घालावा आणि तो लगेच त्याच्या सुपूर्द करून दुसऱ्या राजाकडे चालले जावे हा क्रम ३ वर्ष चालला.  चक्रवर्ती सम्राट होणाऱ्या पुत्राच्या बदली त्या राजाने गालव ला  २०० घोडे द्यावे असे ३ "सौदे" झाले.
ह्या तीन वर्षांमध्ये माधवीच्या मनाला किती वेदना झेलाव्या लागल्या असतील ? पहिले एका पुरुषाला आपले शरीर उपभोगासाठी द्यायचे. मग ते मूल ९ महिने वाढवायचे. आणि जन्म झाल्याबरोबरच त्याला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जायचे, त्या मुलाचे लालन पालन करण्याचीही संधी तिला मिळाली नाही. तिच्या नशिबी मातृत्व तर होते  पण माता बनणे नव्हते.
३ राजांकडून ६०० घोडे घेतल्यानंतर कुठल्याच राजाकडे एक कान काळा असलेले शुभ्र अश्व नव्हते. आता काय करावे ? गालव माधवीला आणि ६०० घोड्यांना घेऊन विश्वामित्रांकडे गेला. उरलेल्या २०० घोड्यांच्या बदली त्यांनी माधवीला सुपूर्द केली. माधवीचा हा पाचवा "सौदा" झाला. विश्वामित्राच्या हाती पुत्र सोपवल्या नंतर विश्वामित्रांनी तिला  तिथेच राहण्यासाठी सुचवले. कारण गालव आता स्वतःची  घर गृहस्थी आणि आश्रम सुरु करण्यास उत्सुक होते. गुरुदक्षिणा देण्याचे "दिव्य" त्यांनी यशस्वीपणे पार पडले होते. माधवीच्या नशिबात चारच पुत्र होते. गालवांना आता तिचा काही "उपयोग " नव्हता. त्यांनी तिला आपल्या सोबत नेले नाहीच.
यावेळी मात्र माधवी आपल्या  दुर्देवाचे  दशावतार निमूटपणे सहन करण्यास तयार नव्हती.
तिच्या मनाचा , स्त्रीत्वाचा , मातृहृदयाचा विचार तिच्या आयुष्यात आलेल्या एकही पुरुषाने केला नव्हता. एक वस्तू समजून तिचा "व्यापार " मात्र करतांना एकालाही लाज वाटली नाही. धर्म तर दूरच पण साधी माणुसकी सुद्धा दाखवली नाही.
माधवीने अश्या दांभिक, स्वार्थी, धर्माच्या नावाखाली शक्तीरूपी स्त्री चा व्यापार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजाकडे पाठ फिरवली. सरळ संन्यास स्वीकारला. आणि ती लुप्त झाली.
सरोगेट मदर निदान स्वतःच पैश्यांसाठी आपले गर्भाशय भाड्याने देते. ज्याचा गर्भ ती वाढवते त्या दम्पत्ती मध्ये काही शारीरिक दोष असल्या मूळे " सरोगसि " चा आधार घ्यावा लागतो. पण माधवीच्या बाबत तसे काहीच नव्हते. घोड्यांच्या बदली माणसाचा सौदा करणाऱ्या या पुरुषांनी कोणत्या तोंडाने समाजात "सभ्यत्व "आणि "आर्यत्व "दाखवले ? आणि किती दिवस मुलगी, बायको किंवा अन्य स्त्री चा असा सौदा होत राहील ?
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा