रविवार, १० मे, २०२०

दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( ५ )



दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय (

रात्रीच्या गर्द काळ्याकभिन्न अंधारात तो एकटाच नदीकाठी उभा होता. वारा सगळ्या जगावर शांततेचे पांघरूण घालत होता.  एरवी दुर्योधनाला ती शांतता प्रसन्नता देणारी असायची. पण आज मात्र त्या शांततेमधले वादळ त्याला अस्वस्थ करत होते. त्या शांततेमध्ये सुद्धा त्याला कर्ण आणि दुःशासनाचे हास्य ऐकू येत होते. आणि हास्यामध्ये विरून गेलेली एका स्त्रीची अगतिक हाक त्याच्या हृदयावर डागण्या देत होती. राहून राहून त्याला आज सभेत घडलेला तो प्रसंग आठवत होता.
" पितामह, तुम्ही या सभेत ज्येष्ठ आहात, धर्म जाणणारे आहात. युधिष्ठिर जर आधीच स्वतःला हरला होता तर मग मला पणाला लावण्याचा त्याला काय अधिकार होता ? तुम्ही माझी लाज राखा. मला वाचवा पितामह, माझे रक्षण करा."
द्रौपदीच्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते. प्रत्येक जण तिच्यासमोर मान खाली घालून बसला होता. पहिले ती सात्विक संतापाने तर्क करून  बोलत होती पण नंतर तिचा स्वर अगतिक होऊ लागला. एखाद्या केविलवाण्या , तडफडणाऱ्या पक्षाप्रमाणे ती ज्याला त्याला मदतीची याचना करत होती. पण कोणीच तिला दाद देत नव्हते.
नंतर मात्र ती याज्ञसेनी पेटून उठली. तिच्या क्रोधाग्नीच्या ज्वाला सगळ्या सभेलाच भस्मसात करतात का काय असे वाटू लागले. दुर्योधनाला आपल्याच बुद्धीवर एक विचित्र झापड आल्यासारखे वाटू लागले. त्याला काही सुचत नव्हते. कुणालाच काही समजत नव्हते. पण त्याचे बाबाच सगळ्यात पहिले भानावर आले. कदाचित अंधत्वामुळे त्यांना द्रौपदीच्या शापाची पूर्वसूचना मिळाली असेल. म्हणूनच शेवटी त्यांनी तिला शांत करून वर मागण्यास सांगितले आणि तिने आपल्या पाच पतींना दास्यत्वातून मुक्त केले ,त्यांचे अस्त्र शस्त्र परत मिळवले. पण वनवास आणि अज्ञातवासाच्या अटींतून मुक्तता करण्याचे विचारले तेव्हा मात्र तिने युधिष्ठीराकडे निर्णय सोपवला आणि त्याने आपण "धर्माचे" पालन करत अटी पूर्ण करू असा निर्धार केला.
खरेतर आज कर्ण, दुःशासन आणि शकुनिमामा त्यांचे शत्रू वनवासात जाणार याचा जल्लोष करून महालातल्या मेजवानीचा आस्वाद घेत होते. पण दुर्योधनाला का कोण जाणे त्यात स्वारस्य वाटत नव्हते. विजयाचा आनंद पोकळ वाटत होता. एक अनामिक धोक्याची जाणीव त्याला अस्वस्थ करत होती. सवयीप्रमाणे मनाला आणि चित्ताला शांतता मिळावी म्हणून तो पाण्याजवळ आला होता पण आज ते पाणीही त्याला भेसूर गढूळ वाटत होते.


" दुर्योधना, असा कसा तू वाहवत गेलास ? स्वतःला नियमांचा पालनकर्ता मानतोस आणि तूच नियम आणि शिष्टाचार वाऱ्यावर सोडलेस ? "
दुर्योधनाने दचकून इकडे तिकडे बघितले. पण कोणीच नव्हते. दुर्योधनाचे अंतर्मनच त्याची निर्भत्सना करत होते.
" काय नियम तोडले मी ? द्यूत आणि त्यानंतर जे काही घडले ते सर्वमान्यच होते." त्याचे उद्दाम मन उसळून म्हणाले.
" मी द्रौपदी बद्दल विचारतो आहे. कुठल्या नियमाने तू तिला भरसभेत खेचत आणून तिचा अपमान केलास ? "
" दासी झाली होती माझी ती. तिचा मालक म्हणून मी काहीही करू शकतो. अगदी.... " त्याचे उद्दाम मनही तो गलिच्छ विचार पूर्ण करू शकले नाही.
" दासीचा देखील मान असतो दुर्योधना, तिचीही मर्यादा असते. आणि तुला जर तिची अभिलाषा होती तर मग तुझ्या स्वतःच्या महालात बोलवायचे होते तिला. ज्या सभेमध्ये आज राजस्त्रिया काय अन्य दासींनाही प्रवेश वर्ज होता त्याच राजसभेत  तिला बोलण्याचे जघन्य पाप केलेस दुर्योधन. स्त्रीची अभिलाषा माणसाचा नाश करते हे सुद्धा तू विसरलास ?" त्याच्या मनाने फटकारले.
" अभिलाषा ? तुला चांगलेच माहिती आहे आजपर्यंत मी भानुमतीशिवाय कुठल्याही स्त्रीकडे बघितले नाही. अगदी दासीकडे सुद्धा नाही. मला तिची अभिलाषा कधीच नव्हती. आज जे काही झाले ते फक्त त्या कुंतीपुत्रांना अपमानित करण्यासाठीच. ते जेव्हा दास झाले तेव्हा एक विचित्र उन्माद माझ्या बुद्धीवर चढला, त्यानंतर जे काही घडले ते कळत होते पण एक अदृश्य शक्तीने माझी मति भारून टाकली जणू काही. असे वाटत होते कि माझे शरीर फक्त तिथे आहे आणि मी दुसरीकडेच कुठेतरी आहे. "
" उन्माद होता तर मग तू आता जो जल्लोष तिकडे सुरु आहे तिथे का नाहीस ? " त्याच्या मनाने टोमणा मारला.
" खरं सांगू, द्रौपदीने जे प्रश्न विचारले ना त्याने मी अस्वस्थ झालो आहे. आजपर्यंत मला असे वाटत होते कि माझे विचार काळाच्या पुढचे आहेत म्हणून. पण तिच्यासोबत जो काही अन्याय घडला त्याची कल्पना मी का नाही करू शकलो हाच प्रश्न मला भेडसावत आहे. समान न्यायासाठी मी कित्येकदा वाद घातले आहे, कर्णाला राजपद देऊन मी अनेकांसोबत शत्रुत्व पत्करले. मला असे वाटत होते कि ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो म्हणून. पण सगळ्यात जास्त अन्याय तर स्त्रियांवरच होतो हे मला का नाही दिसले ?"
" अन्याय तर झालाच आहे तिला भरसभेत बोलावून. " दुसरे मन सुस्कारले.
" नाही,फक्त तेव्हढेच नाही आहे रे.तो अपमान तर होताच पण युधिष्ठीराने जे तिला आपली संपत्ती मानून पणाला लावले त्या अन्यायाचे काय ? पत्नीला संपत्ती का मानायचे ? ती वस्तू नाही, मनुष्य आहे. आणि अन्यायाचा कडेलोट तर पुढेच आहे. पत्नी संपत्ती तर आहे पण तिला त्या संपत्तीमध्ये काहीच अधिकार नाही. असे का ? जन्मभर ती कुणाची ना कुणाची आश्रित म्हणून का राहते ? तिचा सम्मान का पायदळी तुडवल्या जातो ? समाज हे कधी लक्षात घेईल का ह्या विचाराने मी त्रासलो आहे. "
" समाजाचे जाऊ दे, पण आज तुझ्याकडून जो अपराध घडला आहे त्या पापाची शिक्षा तुला भोगावी लागेल हे आता लक्षात घे. आधीच तुला दुष्ट ठरवले आहे सगळ्यांनी. त्यात आजच्या प्रसंगाने अजून काळे फसले आहे. उद्या युद्ध होईल तेव्हा काय परिणाम होतील याचा विचार कर. पण एक वाटते कि निदान द्रौपदी ची क्षमा तू मागावी. " त्याच्या मनाने सुचविले.
एक क्षण दुर्योधनाचे बंडखोर मनही थबकले. पण दुसऱ्याच क्षणी त्याने तो विचार उडवून लावला.
" नाही. माझ्या मनाशी मी अपराधाची स्वीकृती देणे वेगळी गोष्ट आहे. पण जर का मी तिची क्षमा मागितली तर आजपर्यंत माझी जी प्रतिमा आहे तिच्या विरुद्ध गेल्यासारखे होईल. लोक त्याचा बाऊ करतील. दुर्योधन घाबरला, कुंतीपुत्रांसमोर झुकला असेच त्यांना वाटेल. या दुर्योधनाला भेकड म्हणत जग हसेल. नाही, असे कदापि होणार नाही. हा दुर्योधन आजपर्यंत कुणासमोर झुकला नाही आणि या पुढेही झुकणार नाही. मला युद्धाची भीती नाही, पराजयाचे भयही नाही. आणि मृत्यूच माझ्यासमोर मान खाली घालेल. नियतीने ज्या मार्गावर मला चालण्यास भाग पडले आहे तो मार्ग मी घाबरून सोडणार नाही. पुढे यशाचे शिखर असो किंवा अपयशाची दरी ! मी चालतच राहील. हा दुर्योधन थांबणार नाही.
(काल्पनिक प्रसंग)
***************************************************************
द्वापारयुगात आणि त्या आधीच्या युगांमध्ये देखील स्त्रिया ह्या पुरुषाच्या संपत्तीचे द्योतक होत्या. ज्याप्रमाणे गोधन, अश्वधन आणि गजधन हे समृद्धतेचे प्रतीक होते त्याचप्रमाणे अनेक स्त्रिया असणे म्हणजे पौरुषत्वाचे लक्षण मानले जात.
द्रौपदीच्या मानभंगामागचे रूपक ह्या कल्पनेतच लपले आहे.
राजा हा जसा विष्णूचे प्रतीक मानले जात तसेच त्याची राणी देखील लक्ष्मीचे रूप मानले जाई. द्यूतामध्ये युधिष्टिराकडून त्याचे सगळे राज्य आणि वैभव बळकावल्यानंतर खुद्द त्यालासुद्धा दास बनवून दुर्योधनाला आपले वर्चस्व दाखवायचे होते. पण मान्यता आहे कि जो पर्यंत लक्ष्मीचा मान राखल्या जातो तोपर्यंत ती प्रसन्न होऊन गमावलेले सगळे काही वापस देण्याचे वरदान देते. पण लक्ष्मीचा अपमान झाल्यास स्वयं दैवही काही देऊ शकत नाही.
द्रौपदी हि फक्त पांडवांची पत्नी नव्हती तर त्यांच्या समृद्धतेचे रूप होती. खरेतर द्रौपदी स्वयंवरानंतरच पांडवांच्या पाठीशी पांचाल आणि यादवांचे बलाढ्य साम्राज्य उभे झालेले बघून धृतराष्ट्राने युधिष्ठिराला युवराजपद देऊन राजकारणातली दूरदृष्टी दाखवली.
दुर्योधनाने द्रौपदीला दासी बनवून पांडवांना जी चपराक दिली त्यातून सावरायला त्यांना फार वेळ लागला. पण त्या अपमानाचे परिणाम भलतेच झाले. समाजात पांडवांची नाचक्की झाली तरी ते त्या अपमानाने जंगलात जाऊन लाजेने कुढत बसले नाहीत. उलट सूड घेण्यासाठी पुन्हा उभे झाले. आणि त्यांना उद्युक्त केले द्रौपदीनेच  !
द्रौपदीने सभेत जे काही प्रश्न केले ते तत्कालीन समाज आणि धर्माला अनुसरून नव्हते म्हणूनच सभेतल्या सगळ्या धर्मज्ञांनी उत्तर देणे टाळले. ( ह्या विषयावर थोर विदुषी इरावती कर्वे यांचे "युगांतर" या पुस्तकातला द्रौपदी वरचा लेख मुळापासून वाचणे ज्ञानवर्धक ठरेल.)
द्रौपदीचे प्रश्न त्या काली मूर्खपणाचे वाटत असले तरी आजच्या काळात ते प्रश्न मनुष्याच्या मूलभूत अधिकारासाठी तिने पुकारलेल्या लढ्याचे प्रतीक सिद्ध होतात.
द्रौपदीवरच्या अन्यायाचा सूड जरी घेतल्या गेला तरी त्यामागे राज्य मिळवण्याची इच्छा जास्त बळकट होती असेच वाटते. कारण ना युधिष्ठीराने तिची क्षमायाचना केली ना दुर्योधनाने तिची माफी मागितली. स्वतःला कुरुकुलाचे रक्षक समजणारे भीष्मही दासी असली तरी आपल्या नातसुनेच्या रक्षणासाठी उभे होऊ शकले नाही. मग बाकी ज्येष्ठ तर दूरच राहिले. 
द्रौपदीची शोकांतिका यातच दडली आहे, नाही का ?
******************************************************************************
   - सौ.पूर्णिमा देशमुख पुरेकर




 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा